May 2013 | आगळं! वेगळं !!!

एलबीटी वसुलीसाठी पर्याय


http://nathtel.blogspot.com/
बुधवार दि.15 मे 2013 रोजी रात्री एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी व्यापारी प्रतिनिधींना जवळपास बोलूच दिले नाही. प्रत्येक वेळी व्यापारी प्रतिनिधी बोलत असताना त्यांचे बोलणे प्रेक्षकांना कळू नये अशा स्वरात आपले म्हणणे जोरजोरात मांडण्याचा त्यांचा सूर होता. याचवेळी हा एलबीटी तुम्ही कुठे तुमच्या खिशातून भरणार आहात तो तर नागरिकांकडून घेऊन तुम्ही भरायचा आहे याचा उल्लेख केला.
हा कर नागरिक भरणार आहेत, तर मग यासाठी शासनाने व्यापाऱ्यांची माध्यम म्हणून निवड करून त्यांना वेठीस धरण्याचे कारण काय? असा प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. महानगरपालिका इतर जे काही कर नागरिकांकडून वसूल करते त्याच बिलामध्ये हा एलबीटी कर लावून खुशाल वसूल करावा.
याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी या कराला पर्याय म्हणून व्हॅटच्या दरात वाढ करण्याच्या शक्यतेला नकार दिला होता. काही स्थानिक संस्थासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी कर का भरायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मग आता महानगरपालिका हद्दीत असलेल्या व्यापाऱ्यांच्याकडून राज्यातील किरकोळ व्यापारी माल खरेदी करतात तेव्हा राज्यातील इतर सर्व व्यापाऱ्यांनी म्हणजेच नागरिकांनी त्या महानगरपालिकेसाठी हा एलबीटी कर का भरायचा? यावर काय उत्तर आहे. महानगरपालिका हद्दीबाहेर विक्री केलेल्या मालावर एलबीटी भरण्याची सूट दिली जाणार आहे काय?
***

संवेदनाहीन राज्य शासन


http://nathtel.blogspot.com/
कालच सातारा येथे बोलताना मा. शरद पवार यांनी व्यापारी आपले शत्रू नाहीत. मुंबई सारखे होलसेल मार्केट बंद रहाणे राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. एलबीटीच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा, असा सल्ला देऊनही राज्य शासनाकडून अद्यापही त्यादृष्टीने काही सकारात्मक पाऊले उचलली गेल्याचे दिसत नाही. शासनाची संवेदना बोथट झाल्याचे तर हे लक्षण नव्हे
व्यापाऱ्यांचा संप, प्राध्यापकांचा संप, डॉक्टरांचा संप, मागील आठवड्यात झालेला हॉटेल रेस्टॉरंटचा संप, आणि आता आज मेडिकल दुकानदारांचा संप. ही संपण्याऐवजी वाढत चाललेली यादी पाहून राज्यातील किती समाज घटक नाराज आहेत हे लक्षात यावे. पण त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यातून मार्ग काढण्याऐवजी शासनाकडून कारवाई करण्याच्या धमक्या मिळतात. ही सामंज्यस्याची आणि सर्वांना घेऊन पुढे जाण्याची भूमिका निश्चितच नाही.
एलबीटीच्या प्रश्नाबाबत सध्या प्रत्येक जणांकडून व्यापाऱ्यांनाच सल्ला दिला जातो, की त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरु नये, व्यापार सुरू ठेवून आंदोलन करावे. इतक्या दिवसांपासून राज्यातील व्यापारपेठा ठिकठिकाणी बंद ठेवून सुध्दा शासनाची त्यांच्याकडे पहाण्याची तयारी नाही. तेव्हा व्यापार सुरू ठेवून व्यापाऱ्यांनी कितीही विरोध दर्शवायचा प्रयत्न केला तर डोळ्यावर कातडे ओढून बसलेले शासन त्यांच्या मागण्याकडे लक्ष तरी देईल का? याचे उत्तर व्यापाऱ्यांना सल्ला देणारांनी द्यावे.
राजकारणी लोक आणि विविध संघटना जेव्हा बंद पुकारतात तेव्हा दुकाने बंद करा म्हणून व्यापाऱ्यांना वेठीस धरतात. बसच्या काचा फोडतात. व्यापारी तोडफोड करत नाहीत किंवा इतरांवर दबाव आणत नाहीत, तर ते स्वतःच्या मालकीची आपापली दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त करतात. त्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या हाती असलेले हे शस्त्रही त्यांनी वापरू अशी अपेक्षा त्यांच्याकडून का करावी?
शेवटी व्यापारीही एक सर्वसामान्य नागरिकच आहे. तो व्यापार करत असलेली वस्तू वगळता इतर सर्व बाबतीत तो ही ग्राहकच आहे. तेव्हा या बंदमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला त्यालाही तोंड द्यावे लागत आहे, आणि सर्वसामान्यांच्या व्यथाही तो भोगत आहे ही बाब नाकारून चालणार नाही. पण ही दुहेरी भूमिका त्याला का वठवावी लागत आहे याकडे बघणे ही तितकेच गरजेचे आहे.
व्यापार ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांचेच सर्वाधिक आर्थिक नुकसान होत आहे. व्यापारी वृत्तीला नुकसान ही न पटणारी गोष्ट आहे. पण तरीही त्यांच्यावर आज ही वेळ का आली आणि त्यातील आगतिकता काय आहे याचा विचार व्हायला हवा.
पण तसा तो न करता व्यापाऱ्यांनी व्यापार करावा राजकारण करण्याच्या भानगडीत पडू नये असे राज्यकर्ते सुनावतात तेव्हा आश्चर्य वाटते. त्यांच्या वेदना समजून घेण्यापेक्षा आपल्या मालकीच्या राजकारणाच्या क्षेत्रात इतरांचा प्रवेश होऊ नये याकडे यांचे किती लक्ष आहे हे अधोरेखीत होते. तेच लक्ष जर  राज्यातील नाराज समाज घटकांच्या मागण्यांकडे दिले तर, संपकऱ्यांचे प्रश्न चिघळणार नाहीत.
***

कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट




http://nathtel.blogspot.com/
कर्नाटकांत भ्रष्टाचारा ची खांदेपालट

कर्नाटक मध्ये सत्तापरिवर्तन झाले; भाजप आणि जेडीएस दुसऱ्या स्थानानर गेले आणि येडियुरप्पांचाही फुगा फुटला. कर्नाटकात ते होणे अपेक्षितच होते. भाजप मधील अंतर्गत कलहाच्या दररोज बाहेर येणाऱ्या बातम्या आणि भ्रष्टाचारांच्या नवनविन कहाण्या ऐकून राज्यातील लोक कंटाळले होते.
आता मात्र बरे झाले, दगडापेक्षा वीट मऊ! या न्यायाने तेथील लोकांनी स्विकारलेला नविन पर्याय हा या सगळ्या गोष्टींना एक सक्षम पर्याय आहे. भ्रष्टाचार शिरोमणी म्हणून केंद्रात ख्याती पावलेल्या; सर्वच बाबतीतील समृध्द अनुभव गाठीशी असलेल्या काँग्रेसला लोकांनी पर्याय म्हणून स्विकारले आहे.
त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत मतभेद व कलह जसे जाहिरपणे बाहेर येत होते किंवा मिडीयाला हाताशी धरुन आणले जात होते; तसे यापुढे घडताना दिसणार नाही. काँग्रेसमध्ये अश्या गोष्टींना थारा नाही. गॉडमदरच्या हाती एकसूत्री कारभार असल्याने उठ म्हणले की उठायचे आणि बस म्हणले की बसायचे अशा शिस्तीत वाढलेली जेष्ठ मंडळी आता कर्नाटकचा राज्यशकट हाकणार आहेत.
आणि आता रहाता राहिला दुसरा मुद्दा भ्रष्टाचाराचा. या प्रांतातील भाजपचे अननुभवी सुभेदार तो झाकण्यात अपयशी ठरले यावरुन यातील काँग्रेसइतका अनुभव भाजपच्या गाठीशी नव्हता हे स्पष्ट झाले. आता स्वातंत्र्यापासून अपवादात्मक काळ सोडता कायम हाती असलेली केंद्रातील सत्ता, हाती असलेली सीबीआय सारखी तपास यंत्रणा, अवहालातही हवे तसे बदल करण्याची हातोटी अशी सर्व बलस्थाने व अनुभव पाठीशी असलेली काँग्रेस कर्नाटकचा राज्य कारभार पहाणार आहे. त्यामुळे तेथील जनतेला आता सत्तापक्षातील अंतर्गत कलह आणि भ्रष्टाचाराच्या बाहेर येणाऱ्या कहाण्यापासून मुक्ती मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

***

एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक

"http://nathtel.blogspot.com/"
एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक
एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिल्यामुळे, व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला एक नविन बळ मिळाले आहे. व्यापाऱ्यांच्या या मागणीला भाजप व शिवसेना यांनी आधीच पाठिंबा जाहिर केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एलबीटी मागे घेणार नाही, तर लागू करणारच या शासनाच्या हटवादी व हेकेखोर भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अर्थातच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या या व्यापारी प्रेमाला राजकीय किनार आहेच ही गोष्ट लपून राहिलेली नाही. काँग्रेसने सुरूवातीपासूनच व्यापाऱ्यांचा विरोध न जुमानता, एलबीटी लागू करण्याबाबत घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे व्यापारी वर्ग काँग्रेसवर प्रचंड नाराज आहे आणि तो व्यापारी वर्ग येत्या विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला कदापिही मतदान करणार नाही. ही गोष्ट काँग्रेसेतर पक्षांनी नेमकी हेरली आहे. त्यामुळे पाठिंबा जाहिर करत असतांना एकीकडे राज्यातील लाखो व्यापाऱ्यांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवायचा, तर दुसरीकडे वरकरणी व्यापाऱ्यांना सहानुभूती दाखवत आम्ही या प्रश्नावर तुमच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहोत असे चित्र निर्माण करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणायचे, असा एलबीटीच्या राजकारणाचा दुसरा अंक आता रंगत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला व्यापाऱ्यांच्या या मागणीविषयी कळवळा असता तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच एलबीटी लागू करण्याच्या मुद्द्यावरून कडाडून विरोध केला असता. आणि तसे घडले असते तर, व्यापाऱ्यांचा व बेमुदत बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचा अंत पाहिला जात असल्याचे चित्र आज दिसले नसते. पण तसे घडलेले नाही, व्यापाऱ्यांची ही व्होट बँक इतर पक्षांच्या हाती जाऊ नये, आणि मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावरुन अडचणीत आणायची आयती मिळालेली संधी हातची जाऊ नये या दुहेरी उद्देशानेच राष्ट्रवादीने ही खेळी खेळली आहे. ही खेळी मोठ्या साहेबांच्या सांगण्यावरून खेळली गेली असू शकते.
एलबीटीच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत, आणि आता तर सत्तेत सहभागी असलेला मित्र पक्षही या मुद्द्यावर साथ देत नाही अश्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आता मुख्यमंत्री सापडले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही अधिक अंत पाहिला जाऊ नये, आणि सर्वसामान्य नागरिकांचेही हाल होऊ नये असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर, त्यांनी आता हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता व तुटेपर्यंत न ताणता एलबीटी मागे घ्यावा अशीच सर्वसामान्यांचीही भावना आहे.
पुढच्या वर्षीच जीएसटी म्हणजेच गुडस् अँड सर्व्हिस टॅक्स येत आहे, आणि त्यामुळे लागू असलेले इतर सर्व करसुध्दा संपुष्टात येणार आहेत मग एक वर्षापेक्षाही कमी कालावधीसाठी हा एलबीटी टॅक्स लागू करण्याचा राज्य शासनाचा एवढा अट्टाहास का? व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे काही उत्तर आहे का?